OPINIONMAKER

Wednesday, April 2, 2014

अखेर टाईपरायटर म्युझियममध्ये


शासकीय व्यवस्थेत अमुक गोष्ट अशीच का केली जाते हे विचारण्याचे धाडस कुणी करत नाही. त्यामुळे जगामध्ये परिवर्तन होत असले तरी शासन व्यवस्थेत त्याचे वारे वाहायला अनेक दशके जावी लागतात. टायपिंग मशिनचे असेच आहे. आता बहुतेक शासकीय कार्यालयांमधून टाईपरायटर हद्दपार झाले असले तरी राज्यील टाईपरायटिंग इन्स्टिट्यूना सांगण्यासाठी 2014 साल उजाडावे लागले.


आता सरकारनेच अधिकृतपणे जाहीर केल्याने टाईपरायटरचा खट् खट् खटाक् खट्  असा आवाज कायमचा थांबणार आहे. खरे तर टाईपरायटर मशिनचे उत्पादन करणाऱ्या गोदरेज अँड बॉईस या कंपनीने 2011 मध्येच उत्पादन थांबवत असल्याचे जाहीर केले. टाईपरायटरचे उत्पादन करणारी ही शेवटची कंपनी होती. पण त्याबाबतचा सरकारी पातळीवरील निर्णय होण्यास तीन वर्षे जावी लागली.

एक काळ असा होता की मुलगा किंवा मुलगी इंटर पास झाली की लगेच टायपिंगचा क्लासला जात असे. पदवी आणि सोबत टायपिंगच्या परिक्षेचे प्रमाणपत्र असले की शासकीय कार्यालयात, न्यायालयात गेला बाजार एखाद्या बड्या कंपनीत टायपिस्ट म्हणून लागण्याची संधी असायची. एकदा का अशी नोकरी लागली की आयुष्याचे सार्थक होऊन जायचे. टायपिंग बरोबर शॉर्टहँड येत असेल तर सोन्याहून पिवळे अशी स्थिती असायची. त्या काळात टायपिंग आणि शॉर्टहँड येणाऱ्या अनेक मुलींचे खासगी कंपन्यांमध्ये साहेबाची सेक्रेटरी म्हणून करिअर घडले. नंतरच्या काळात जिल्ह्याच्या ठिकाणाबरोबरच तालुक्याच्या ठिकाणीदेखील दोन-चार टायपिंग इन्स्टिट्यूट दिसू लागल्या. सगळीकडे 40, 50, 60 च्या स्पीडच्या परिक्षांचे पेव फुटले. एक परिक्षा उत्तीर्ण झाली की लगेच स्पीड वाढवून दुसऱ्या परिक्षेला बसायचे, असा ध्यासच शासकीय नोकरीसाठी आसुसलेल्या एका पिढीने घेतला होता. सकाळी कॉंलेजला जायचे आणि दुपारी, संध्याकाळी टायपिंगच्या क्लासला जाण्याचा त्यावेळी ट्रेंड होता. नियंत्रित अर्थव्यवस्थेत लोकांची स्वप्ने मर्यादितच होती. दुपारच्या शांत वातावरणात चालताना कानावर खट् खट् खटाक् खट्  आवाज यायचा आणि मग टायपिंग इन्स्टिट्यूटमधील त्या दृश्याकडे लक्ष जायचे. समोरच्या मशिनवर टायपिंगचा सराव करत लाकडी स्टुलवर बसलेले भावी शासकीय कर्मचारी नजरेस पडायचे. टायपिंगच्या क्लासमध्ये शेजारी-शेजारी बसून प्रेमात पडल्यावर नंतर घरातून बाहेर पडण्यासाठी टायपिंगचा क्लास हे कारण पुरेसे विश्वासार्ह ठरत असे.

टाईपरायटरवर काम करण्याची गंमत होती. त्यात अचूकतेला अतिशय महत्व होते. चूक झालीच तर व्हाईटनरशिवाय पर्याय नसे. टायपिंग करताना एक ओळ पूर्ण केली पुढच्या ओळीला जाण्यासाठी कडेचा दांडा फिरवावा लागे. नवख्या व्यक्तीने वेगाने टायपिंग करण्याचा प्रयत्न केला की टाईपरायटरमधील अक्षरांचे दांडे एकमेकात अडकत असतं. मग काम थांबत असे. टायपिस्टला ते अडकलेले दांडे हाताने सोडवावे लागत आणि मग पुन्हा टायपिंग सुरू करावे लागे. कधीकधी त्या दांड्यात रिबन अडकत असे. मग ती काढण्यासाठी हात काळे करावे लागत. अशा या टाईपरायटच्या निर्मितीत अनेकांचे योगदान आहे.  हेन्री मिल या ब्रिटीश नागरिकाने मोठ्या मेहनतीने आणि अभ्यासाने हे टाईपरायटर मशिन बनवले होते. त्यासाठी त्याला खर्चही खूप आला होता. 1714 मध्ये त्याने त्याबद्दल पेटंट मिळवले. त्यानंतर त्याच्याबाबत फार माहीती मिळत नाही. मधल्या काळात अनेकांनी या मशिनमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी अनेक स्वतंत्रपणे प्रयत्न केले. 1829 मध्ये विल्यम ऑस्टिन बर्ट यांनी टायपोग्राफर तयार करून पेटंट मिळवले. व्यावसायिक पातळीवर यशस्वी ठरलेला पहिला टाईपरायटर बनवला तो अमेरिकेतील ख्रिस्तोफर शोल्स आणि कार्लोस गिडेन यांनी 1868 मध्ये. कीबोर्डवरील अक्षरांची ही रचना आणि पहिला टाईपरायटर तयार केला ख्रिस्तोफर शोल्स ह्या अमेरिकन माणसाने. १८७२ साली शोल्सने त्याचे पेटंट रेमिंग्टन ह्या टाईपरायटर कंपनीला १२००० डॉलर्सना विकले. तेव्हापासून शोल्सने तयार केलेली कीबोर्डवरील अक्षरांची रचना काहीही बदल न होता जशीच्या तशी चालत आली आहे. टाईपरायटर मध्ये सतत अनेक बदल होत. भारतावर इंग्रजांची राजवट असताना देशात टाईपरायटरचं आगमन झाले स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय भाषांमध्ये, भारतीयांची गरजा पूर्ण करण्यासाठी टाईपरायटरची गरज भासू लागली व त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी ही बाब बोलून दाखविली. गोदरेजसमूहाने हे आव्हान स्वीकारले व यशस्वीरीत्या पार पाडले. 1950 मध्ये दिल्लीत भरलेल्या औद्योगिक प्रदर्शनात पं. नेहरूंनी एका मशिनवर काही बटणे दाबून टाईपरायटरचे प्रात्याक्षिक पाहिले. नंतर काही काळातच हा टाईपरायटर शासकीय सेवेत रुजू झाला. आता हे सगळे थांबले आहे. गोदरेजने 2011 मध्ये टाईपरायटरचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला. त्याअगोदरच हाल्डा (ब्रिटीश), ई. रेमिंग्टन अँड सन्स (अमेरिका) आणि फॅसिट (स्वीडन) या कंपन्यांनी उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला होता.


गेल्या वीस-पंचवीस वर्षात तंत्रज्ञानात वेगाने बदल होत गेले. त्याचवेळी अर्थकारणातही आमूलाग्र परिवर्तन झाले. या सगळ्याच्या रेट्यामुळे इच्छा असो किंवा नसो समाज जीवनातही झपाट्याने मोठे बदल झाले. टाईपरायटरची जागा बहुपयोगी संगणकाने घेतली. एकवेळ अशी होती की, एलआयसी, बँका, शासकीय कर्मचाऱ्यांच्या सगळ्या संघटनांनी संगणकाला कडाडून विरोध केला होता. संगणकामुळे बेरोजगारी वाढेल असा त्यांचा दावा होता. प्रत्यक्षात विमा आणि बँकिंग क्षेत्रात खासगी कंपन्या आल्याने रोजगाराच्या संधी प्रचंड वाढल्या, त्याचबरोबर अनेकांना मान मोडून काम करण्याची सवय करून घ्यावी लागली. हे सगळे तंत्रज्ञान आणि नव्या अर्थव्यवस्थेचे परिणाम आहेत. टाईपरायटर ही चीज कालबाह्य झाली आहे हे महाराष्ट्र शासनाला समजायला आणि तसा अधिकृत आदेश काढायला 2014 साल उजाडावे लागले. 15 नोव्हेंबर 2015 अखेरपर्यंत राज्यातील सर्व टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटनी संगणक वापरण्यास सुरवात करावी आणि त्यांच्या 

अभ्यासक्रमांचे स्वरुपही शासनाच्या जीआरनुसार बदलले आहे. त्यामुळे या संस्था आता संगणक प्रशिक्षण संस्था होणार आहेत. या संस्थांनी तसे बदल केले नाहीत तर त्यांचे परवाने रद्द होणार आहेत. राज्यात सध्या अशा 10,000 टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट आहेत. आता त्या सगळ्यांचे रुप पालटणार आहे. अर्थात शासनाचा हा निर्णय क्रांतिकारक असला तरी तो दहा वर्षापूर्वीच घ्यायला हवा होता.

-सुहास यादव

No comments: