नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी येथे झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूरचित्रवाणी वृ्त्त वाहिन्यांच्या पत्रकारितेबाबत काही विधाने केल्यानंतर पत्रकारांनी त्यांच्यावर बहिष्काराचे अस्त्र उपसले. अजित पवारांनी त्यांच्या स्वभावानुसार या अस्त्राकडे ढुंकनही पाहिले नाही. आपण काहीच चुकीचे बोललेलो नाही आणि त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही, असे सांगून ते त्यावर ठाम राहिले. त्यामुळे केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी * अटी लागू अशा प्रकारची दिलगिरी व्यक्त केल्यानंतर पत्रकर पुढार्यांनी तातडीने अजित पवार यांच्यावरील बहिष्कार मागे घेतल्याचे जाहीर करुन टाकले आणि या प्रकरणातून एक प्रकारे स्वतःची सुटका करुन घेतली. मूळ मुद्दा आहे तो हे सगळे कशामुळे घडले. सध्याची पत्रकारिता आणि पत्रकारांना नोकरी म्हणून काय गोष्टींना तोंड द्यावे लागते आणि अजित पवार यांचे राजकारण कशा पद्धतीने चालते?