OPINIONMAKER

Friday, April 18, 2008

नेत्यांचे प्रेम


एकीकडे स्त्री-पुरुष संबंधांमधील खुलेपणा आणि त्यामुळे निर्माण होणारे कौटुंबिक आणि सामाजिक प्रश्‍न पाश्‍चात्य देशांना सतावत आहेत, तर दुसरीकडे स्त्री-पुरुष संबंधांना नैतिक-अनैतिकतेचे पांघरूण घातल्यामुळे आपल्या देशातही अनेक प्रश्‍न निर्माण होत आहेत. आपल्याकडे त्याचा सर्वाधिक त्रास स्त्रियांना होतो. कारण सुसंस्कृतपणा, नैतिकता, नियम पाळण्याची जबाबदारी स्त्रियांवर टाकून

Tuesday, April 8, 2008

आमचे हीरो


ही सर्व मुले सामान्य कुटुंबातून आलेली होती. माझ्या भावंडाचे शिक्षण होऊ देत, मला जर नीट सेटल होऊ देत मग भ्रष्टाचाराविरुद्ध लढू, असे त्यांना कधी वाटले नाही. मनात आणले असते तर त्याच यंत्रणेचा भाग होऊन त्यांना त्यांचा वाटा मिळत राहिला असता. त्यांनी वाट्याचा विचारही केला नाही. भ्रष्ट यंत्रणेविरुद्ध आवाज उठवला. त्यासाठी प्राणाची किंमत मोजली. असा आवाज उठवणाऱ्यांना...
विशेष संरक्षण देण्यासाठी कायदा तातडीने कायदा करण्याची गरज आहे.

Thursday, March 13, 2008

लोकभावनेची कदर

हा लेख अगदीच स्थानिक विषयावर आहे। त्यामागे काही घटनांचा संदर्भ आहे. एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या प्रतिमेला धक्का पोचवण्याचे काम स्वयंघोषित निष्ठावंतच कसे करतात याची झलक या लेखावर काम करताना मी अनुभवली.

------------

लोकभावनेची कदर


शनिवारवाड्यापासून एरंडवण्यापर्यंत नदीपात्रातील रस्त्याचा विकास करण्याच्या कामावरील स्थगिती न्यायालयाने उठवली आणि महापालिका प्रशासनाने कौतुकास्पद कार्यक्षमता दाखवून तातडीने या रस्त्याचे डांबरीकरण केले. प्रशासनाने मनात आणले तरी एखादे विकासाचे काम किती तत्परतेने होऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
------
नदीकाठच्या रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने कोथरूड, कर्वेनगर, वारजे-माळवाडीहून नोकरीव्यवसायासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात येणाऱ्या आणि संध्याकाळी परतणाऱ्या नागरिकांना मोठाच दिलासा मिळाला आहे. पुण्याचा आर्थिक आणि औद्योगिक विकास वेगाने होतो आहे. व्यवसाय आणि नोकरीच्या उत्तम संधी या शहरामध्ये आहेत. त्यामुळेच पुणे आणि आसपासच्या जिल्ह्यांतील लोक पुण्यात स्थायिक होण्याचा वेग वाढतो आहे. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने आलेल्या या नागरिकांना मग राहण्यासाठी उपनगरांमध्ये आणि आता त्यापुढे जाऊन पुण्याच्या आसपास होत असलेल्या नव्या बांधकामांमध्ये कर्ज काढून सदनिका घेण्याचा पर्याय असतो; पण त्यांना रोजच्या कामासाठी शहरात यावे लागते किंवा अगदी शहर ओलांडून दुसऱ्या टोकालाही जावे लागते।



या परिस्थितीत कोथरूड, कर्वेनगर परिसरातून येणाऱ्या नागरिकांना कर्वे रस्त्याखेरीज दुसरा पर्याय नाही. मुळातच कर्वे रस्त्यावर वाहतुकीचा प्रचंड ताण आहे. कितीही एक मार्गी रस्ते केले किंवा नव्या कल्पना राबवल्या तरी वाहतुकीवरील ताण कमी होत नाही, असे चित्र दिसते. त्यामुळे या रस्त्याला नदीपात्रातील रस्ता हा पर्याय आहे. या रस्त्याचे ग्राऊटिंगचे काम होऊनही केवळ पर्यावरणाची काळजी वाहणाऱ्यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे हे काम सात-आठ वर्षे रखडले होते. तरीही खड्डे असलेल्या खडबडीत रस्त्याचा वापर रोज हजारो वाहनचालक करतच होते। मुळात या शहराच्याच नव्हे, तर पृथ्वीवरील पर्यावरणाबाबत जागरूकता वाढत आहे. पर्यावरणाचे संतुलन राखले पाहिजे, यावर कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही; पण अचानक एक दिवस उठून 2000 सालापासून किंवा 2008 पासून आता नदीच्या परिसरातील पर्यावरणाची काळजी व्यक्त करून कुणी न्यायालयात जाणार असतील, तर त्यांना विचारावे लागेल, की अहो महाशय 1910 मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली आणि लोक नदीच्या पलीकडे छावण्यांमध्ये राहायला गेले आणि नंतर तेथे रस्ते, बंगले, सोसायट्या झाल्या. त्यापूर्वी तेथे केवळ शेतजमीन आणि वनसंपदा होती. ती या लोकांनी तोडली. शेते नष्ट केली आणि बंगले बांधले. एका दृष्टीने पर्यावरणाच्या ऱ्हासाला तेथून सुरवात झाली. आता तुमच्या वाडवडिलांनी अगोदर येऊन तिथे बंगले बांधले, सोसायट्या तयार केल्या आणि आता आमची पहिलीच पिढी व्यवसाय-नोकरीसाठी पुण्यात आली असेल तर आम्हाला येण्या-जाण्यासाठी रस्ता करायचा म्हटले तर तुम्ही लगेच आडवे पडणार, हा कुठला न्याय? सगळ्या जगाचे शोषण करून आपले पोट भरले आणि वर साठा करता आला की ज्याप्रमाणे अमेरिका इतर गरीब देशांना शहाणपण शिकवायला लागते, त्याच प्रवृत्ती रस्त्याला विरोध करत आहेत. पर्यावरणाची काळजी 2008 पासून कशाला 1910 पासूनच करू या. आता शहराची वाढ थांबवा, पर्यावरणाची काळजी करा, असे म्हणून कुणाला रोखणे योग्य नाही।


वादाचा मुद्दा बाजूला ठेवून त्यांचा रस्त्याला असणारा विरोध रास्त आहे, असे आपण क्षणभर समजू. नदीतील रस्त्याची आम्हालाही अजिबात गरज नाही; पण मग पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचे आदेश न्यायालयाने प्रशासनाला किंवा सरकारला द्यावेत, अशी याचिका जिमखान्यावरील पर्यावरणवाद्यांनी दाखल करावी. पुण्यातील पर्यावरणाची खरेच काळजी वाटत असेल तर प्रथम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कार्यक्षम करणे गरजेचे आहे. बसथांब्यावर आल्यानंतर मला पाच मिनिटांत बस मिळेल आणि इच्छित ठिकाणी वेळेवर पोचता येईल, असा विश्‍वास नागरिकांच्या मनात निर्माण झाला तर लोक स्वतःहून दुचाकी वाहने वापरण्याचे बंद करतील. ही वाहने कमी झाल्यास बस वेगाने धावू शकतील. अपघातांचे प्रमाण कमी होईल; पण दुचाकी कमी होणे, त्यांचा खप कमी होण्यामुळे अनेकांच्या हितसंबंधांना धक्का पोचणार आहे. त्यामुळे तसे होण्याची अजिबात शक्‍यता नाही। त्यामुळे जिमखान्यावरील पर्यावरणवाद्यांना खरी कळकळ असेल तर त्यांनी एखाद्या रस्त्याचा किंवा गल्लीचा विचार न करता शहराच्या पर्यावरणाचा व्यापक विचार करावा. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या एका सद्‌गृहस्थांनी माझ्या दारात उद्यान करायचे आहे म्हणून रस्त्याचे काम अडवून ठेवल्याचे उदाहरण केवळ पुण्यातच पाहायला मिळू शकते. खरेच पर्यावरणासाठी काम करायचे असेल व्यावसायिक हितसंबंध जोपासणाऱ्या वेगवेगळ्या लॉबींच्या विरोधात आवाज उठवून त्यात सातत्य राहील असे प्रयत्न झाले पाहिजेत. कारण नदीपात्रातील रस्तादेखील काही दिवसांनी अपुराच पडणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कार्यक्षम करणे, हाच अंतिम उपाय असणार आहे. सध्या नदीपात्रातील रस्ता झाल्यामुळे एरंडवण्याच्या पलीकडे राहणाऱ्या दोन-तीन लाख लोकांची तात्पुरती का होईना सोय झाली आहे. त्याबद्दल महापालिका प्रशासनाला धन्यवाद!

- सुहास यादव

Sunday, March 9, 2008

जातींचे प्रकटीकरण

नुकताच मुंबईत एका चर्चासत्राला उपस्थित राहण्याचा योग आला. चर्चेचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील एका प्रख्यात विद्यापीठातील एका विभागाच्या प्रमुखांकडे होती. अर्थातच ते उच्चविद्याविभूषित आहेत. त्यांनी डॉक्‍टरेट मिळवलेली आहे. त्यांच्या पेहरावावरुन ते आर्थिकदृष्ट्या चांगलेच सुस्थितीत असल्याचे दिसत होते. महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक विषयासंदर्भात प्रसिद्धीमाध्यमातील प्रतिनिधींची जाण असा चर्चेचा विषय होता. चर्चेला प्रारंभ करतानाच त्यांनी पुण्यात झालेल्या चित्पावान ब्राह्मणांच्या संमेलनाचा उल्लेख करुन या घटनेचे विश्‍लेषण करताना....... 

Thursday, February 28, 2008

माणूस श्रेष्ठ

आपण श्रेष्ठ आहोत तर मग आपल्याला मान-सन्मान का मिळत नाही? मान राहू द्या, उलट संधी मिळेल तेव्हा टिंगलटवाळी आणि चेष्टा का केली जाते, असे प्रश्‍न इथल्या ब्राह्मणांना पडले आहेत. सामाजिक एकजिनसीपणाच्या दृष्टीने विचार केला तर इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा आपले श्रेष्ठत्व कसे बाजूला ठेवायचे आणि इतर जातींना विश्‍वासात कसे घ्यायचे हा खरा प्रश्‍न आहे.
----
गेल्या काही वर्षांत ब्राह्मणांची संमेलने आवर्जून आयोजित करण्यात येत आहेत. त्यांना प्रतिसादही मिळतो आहे. जातींची संमेलने घेण्याला कुणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु, आपण सर्वश्रेष्ठ आहोत असे ब्राह्मण आपल्या प्रत्येक पिढीला सांगत आले आहेत. आजही हे ठामपणे सांगितले जाते. ज्ञान आणि बुद्धीमत्तेबाबत आपण इतरांपेक्षा श्रेष्ठच आहोत, अशी स्थिती असताना मग असे काय घडले आहे किंवा घडत आहे की संमेलने घ्यावी लागत आहेत आणि आपले प्रश्‍न, व्यथा मांडाव्यात, असे वाटू लागले आहे?
वेद-पुराणे, धर्मशास्त्र यावर आजही ब्राह्मणांच्या ताब्यात आहेत. हिंदुंमधील कुठल्याही जातीला हे (वेद-पुराणे, धर्मशास्त्रातील नियम-आचरण-शिक्षा) आपले वाटत नाही. ह्याची आपण माहिती घ्यावी, आचरणात आणावे, असे वाटत नाही. दुसरीकडे आज जे काही थोडे ब्राह्मण याचा अभ्यास करुन तसे जीवन जगतात त्यांनाही ही माहिती हा ठेवा इतर जातींना द्यावा, असे वाटत नाही. वेदपाठशाळा, शंकराचार्यांचे मठ, अशा ठिकाणी शिकण्यासाठी किंवा अशा संस्थांवर संचालक किंवा विश्‍वस्त म्हणून अन्य जातींमधील किती लोकांना प्रवेश दिला जातो? अनेकदा सरकारी अनुदान घेतले तर कदाचित मागासवर्गीयांना आपल्या संस्थेच्या मंडळात समाविष्ट करुन घ्यावे लागेल म्हणून "अनुदान नको', अशी भूमिका घेतली जाते. आम्हांला सरकारी मदतीची गरज नाही, असे यावर सांगितले जाईल. मग नका घेऊ सरकारी मदत पण तुमच्यात अन्य जातींना प्रवेश देणार का, असा प्रश्‍न आहे.

आता त्याचवेळी वाढते नागरीकरण, स्पर्धात्मक बाजारपेठ, जगण्यासाठीची रोजची जीवघेणी धावपळ यामुळे सर्वसामान्य ब्राह्मणांना देखील याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. नव्या पिढीतील अनेकांना पंरपरा, आपला अभिमानास्पद प्राचीन वारसा याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. पण मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात हे आपले आहे, असे सर्वसामान्य ब्राह्मणाला वाटत असते. इतर कुठल्याही जातीला असा वारसा जपण्यासाठी धडपड करावी लागत नाही. मग आता ह्या आपल्या वारश्‍याचे काय करायचे, ते आचरणात कसे आणायचे आणि रोजच्या जगण्याशी त्याची कशी सांगड घालायची, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या सगळ्याशी हिंदूंमधील सगळ्या जातींना कसे जोडायचे हा तर मोठाच प्रश्‍न आहे।

वेद-पुराणे आणि इतर धर्मशास्त्रे इतर जातींसाठी कधीच खुली नव्हती. त्यामुळे ब्रिटीशांच्या आगमनानंतर सुरु झालेल्या शाळा, विद्यापीठे, महाविद्यालयांमधून सर्वच जातीधर्मांसाठी ज्ञान खुले झाले. ते ज्ञान हिंदुधर्मशास्त्राचे नव्हते. महात्मा फुल्यांनी त्याचे महत्त्व ओळखले आणि शिकण्यासाठी अन्य जातींना प्रवृत्त करण्याचे, त्यांना शिक्षण देण्याचे कार्य हाती घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तर "शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा' असा संदेशच दिला।

स्वातंत्र्यासाठी लढा चालू असताना आणि ते मिळाल्यानंतर अनेक समाजसुधारकांनी सर्वांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून आयुष्यभर निरपेक्षपणे कार्य केले. मग वर्षानुवर्षे ज्ञान घेण्याची संधी नाकारल्या गेलेल्या जातींमध्ये वेगाने शिक्षणाचा प्रसार झाला. सर्व प्राणीमात्रांमध्ये माणूस सर्वश्रेष्ठ आहे, कारण त्याला बुद्धीची अनमोल देणगी लाभलेली आहे याचा साक्षात्कार सगळ्या जातींना झाला. विशिष्ट जातीत जन्माला आला म्हणून कुणी श्रेष्ठ नसतो याचे भान त्याला आले. मग तो समतेची भाषा बोलू लागला. प्रश्‍न विचारु लागला.
इथे ब्राह्मणांच्या मानसिकतेचे आणि संमेलनांचे मूळ आहे. वेद-पुराणे, धर्मशास्त्र हे सगळे आपले आहे तर आपण ते कुणी सांभाळायचे? आचरणात कुणी व कसे आणायचे? शेंडी, जानवे ही ब्राह्मण असल्याची प्रतिके आहेत तर मग ती अंगावर अभिमानाने बाळगायची का? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण सर्वश्रेष्ठ आहोत तर मग आपल्याला सगळे मानसन्मान का देत नाहीत, या मानसिकतचे काय करायचे? मान द्यायचे राहू द्यात उलट टिंगलटवाळी, निराधार आरोप आपल्यावर का होत आहेत असा प्रश्‍न पडला आहे. त्याचबरोबर इथल्या जातीव्यवस्थेतेमुळे आमच्या पूर्वजांकडून अन्य जातींवर कदाचित अत्याचार झाले असतील त्याची शिक्षा आम्हांला का, असे प्रश्‍न ब्राह्मणांच्या मनात आहेत. त्यामुळे संमेलनांमध्ये शिक्षण, उद्योग अशा अन्य विषयांवर चर्चा होत असली तर खदखद आहे ती सन्मानाची.
मग सन्मान मिळवायचा कसा? सन्मान मिळतो तो त्यागी वृत्तीमुळे. मग सन्मान हवा असेल तर काही गोष्टींचा त्याग करावा लागेल. त्यासाठी माणूस श्रेष्ठ, असा व्यवहार झाला पाहिजे. श्रेष्ठ माणसाच्या गळ्यात थुंकण्यासाठी गाडगे आणि तो चालत गेल्यावर रस्ता खराब होणार म्हणून त्याच्यामागे झाडू बांधल्यावर त्याला काय वाटले, असेल याचा विचार आपण कधी करतो का? पिढ्यानपिढ्या असा अपमान सहन केलेल्यांना आपण जवळ घेणार का? विचार करा सध्या आपल्यावर निराधार आरोप केले जातात म्हणून प्रचंड अस्वस्थता वाटते तर, मग हजारो वर्षे अपमानित स्थितीत जगणाऱ्यांच्या मनात महप्रचंड ज्वालामुखीच असला पाहिजे. तो बाहेर पडला तर...


दुसरा प्रश्‍न आमच्या पूर्वजांनी केलेल्या वर्तनाची शिक्षा आम्हांला का? एक लक्षात घेतले पाहिजे की पूर्वजांचा वारसा घेतला की त्यातील चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी येणार. पुराणे-वेद, मंत्र, कथित श्रेष्ठत्व हा पिढ्यानपिढ्या आलेला वारसा आपला समजत असू तर अन्य जातींशी आपल्या पूर्वजांनी केलेल्या व्यवहाराची जबाबदारी आपल्याला टाळता येणार नाही. त्यामुळेच एकजिनसी समाजाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सन्मान हवा असेल तर, जातीच्या श्रेष्ठत्वाची जी कल्पना आहे ती मनातून बाजूला काढावी लागेल. सध्या शहरीकरणाच्या रेट्यामुळे अपरिहार्यता म्हणून वरवर ती बाजूला ठेवली गेल्याचे दिसते. थोडक्‍यात आपण इतर जातींशी स्वतःला कसे जोडून घेणार याचा विचार करुन त्यासाठी एक पाऊल खाली उतरण्याची तयारी असेल तरच काही विधायक घडण्याची स्वप्ने पाहता येतील.

-सुहास यादव
----------------------